Sunday 31 July 2016

जिम लेकर


एकदिवसीय क्रिकेट तसेच टि-२० क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे फलंदाज महत्त्वाची भुमिका निभावतो त्याच वेळेस कसोटीचा विचार करता गोलंदाजाची कामगिरी महत्त्वाची ठरते. कारण सामन्यात २० फलंदाज बाद करुन संघाला विजय प्राप्त करुन देतो. फलंदाजाची शतकी खेळी आणि गोलंदाजाच्या ५ विकेट दोघांची कामगिरी समान मानली जाते.१३९ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात अनेक दर्जेदार गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने आपले नाव सुवर्ण अक्षरात लिहिले मग त्यात कसोटी इतिहासात पहिल्यांदा ५०० बळींचा टप्पा पार पाडणारा वेस्ट इंडिजचा कर्टनी वॉल्श असो वा ८०० बळींचा टप्पा पार पाडणारा श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांनी युवा गोलंदाजांसाठी एक लक्ष्य निर्माण करुन ठेवले आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या जिम लेकर यांनी एका सामन्यात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम  आपल्या नावे केला आहे.
पण इतक्या वर्षांच्या क्रिकेट इतिहासात एका डावात दहा बळी बाद करण्यात फक्त दोन गोलंदाजांना यश आले. त्यातील पहिले होेते इंग्लंडचे फिरकी गोलंदाज जिम लेकर आणि सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना. ३१ जुलै १९५६ साली आेल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जिम लेकर यांनी ही कामगिरी केली. या  सामन्यातील दुसऱ्या डावात त्यानी  धावात 10 गडी बाद केले. त्यांच्या गोलंदाजीचे पुथ:करण ५१.२-२३-५३-१० असे होते तर सामन्यात ९० धावांत १९ गडी बाद केले. याच अॅशेस मालिकेत त्यांनी तब्बल ४६ गडी बाद केले आणि इंग्लंडला २-१ ने मालिका विजय प्राप्त करुन दिला.
जिम लेकर यांनी कसोटी कारकिर्दीत ४६ सामन्यात १९३ गडी बाद केले तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४५० सामन्यात त्यांनी तब्बल १९४४ गडी बाद केले. २३ ऑगस्ट २००९ साली जिम लेकर यांचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला.

शंतनु कुलकर्णी



Sunday 24 July 2016

कॅरेबियनचा बादशहा सुनिल मनोहर गावसकर

कॅरेबियन उत्तर अमेरिका खंडातील बेटांचा समुह. यातील प्रत्येक बेट एक देश म्हणून गणला जातो. यात जमैका, त्रिनीदाद, सेंट ल्युसिया तसेच सेंट किट्स यांसारख्या देशांचा समावेश होतो. क्रिकेट सोडल्यास इतर सर्व खेळांमध्ये त्या त्या देशांचे नेतृत्व करतात तर फक्त क्रिकेटमध्ये हे सर्व देश ऐकत्रित येऊन वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय़ पातळीवर करतात.
सुनिल मनोहर गावसकर मुंबईमध्ये जन्मलेल्या या खेळाडूने क्रिकेटविश्वात आपल्या खेळाने सर्वांना आकर्षित केले. सुनिल गावसकर म्हणजे 'उंची लहान किर्ती महान' असे व्यक्तिमत्व. १९७१ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात गावसकरांचा संघात समावेश झाला. परंतु दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातुन बाहेर बसावे लागले. तरीही गावसकरांनी आपली पदार्पणाची मालिका आपल्याच नावे केली. 

त्रिनीदाद मध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही डावात अर्धशतके झळकावली आणि वेस्ट इंडिजविरुदध पहिला विजय मिळवला, हाच विजय भारताला मालिका जिंकवण्यात महत्त्वाचा ठरला. त्यानंतरच्या कसोटीत गावसकरांनी कारकीर्दीतले पहिले शतक झळकावले आणि विक्रम स्थापन होण्यास सुरुवात झाली. आपल्या या खेळीत त्यांनी फ्लिक, स्ट्रेट ड्राईव्ह, स्केअर कट तसेच पुल यासारख्या फटक्यांची मेजवानी दिली आणि नव्या युगाला सुरुवात झाली. या मालिकेत ८ डावांत ४ शतके व ३ अर्धशतकासहीत ७७४ धावा ठोकल्या. यात शेवटच्या कसोटीत शतक आणि व्दिशतक झळकावले. वेस्ट इंडिजविरुद्ध २७ सामन्यात सर्वाधिक १३ शतके आणि २७४९ धावांचा विक्रमही गावसकरांच्या नावे आहे. १३ शतकांमधील ७ शतके त्यांनी वेस्ट इंडिजमध्ये फटकावली. गावसकरांनी आपल्या कारकिर्दीत कधीही हेल्मेट वापरले नाही त्यानी फक्त पांढरी गोल टोपी आणि त्यासोबत डोक्यासाठी सुरक्षित कवच वापरले. परंतु ज्याप्रकारे गावसकरांनी वेस्ट इंडिजच्या तोफखाना समजल्या जाणाऱ्या गोलंदाजांचा सडेतोड समाचार घेतला.

साल १९७१ पूर्वी भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकही सामना जिंकला नव्हता. एका तगड्या संघाला त्यांच्याच देशात हरवणे तितकेच अवघड होते परंतु हे काम केले ते मुंबईकर त्यावेळचा भारताचा कर्णधार अजित वाडेकर आणि सुनिल गावसकर त्यांना साथ दिली दिलीप सरदेसाई यांनी. १९७०-७१ ची मालिका जिंकवण्यात दिलीप सरदेसाई यांनी ६४२ धावा फटकावत गावसकरांना चांगली साथ दिली. भारताला जागतिक क्रिकेटमध्ये नवी दिशा देण्यास १९७०-७१ सालची वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरली.

गावसकरांनी याच कामगिरीची पुनरावृत्ती १९७८-७९ च्या मायदेशात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेत केली त्यात त्यांनी ७३२ धावांचा पाऊस पाडला. कसोटी कारकिर्दीत १०००० धावांचा पल्ला पार करण्याचा पहिला मान गावसकरांच्या नावोच आहे तसेच त्यांचा ३४ शतकांचा विक्रमही कित्येक वर्षे त्यांच्याच नावे होता त्यानंतर सचिन तेंडूलकरने मोडला. त्यामुळे 'कॅरेबियनचा बादशहा' म्हणून लिटल मास्टर सुनिल गावसकर नेहमिच अग्रस्थानी राहतील.

शंतनु कुलकर्णी

Saturday 23 July 2016

अष्टपैलु अश्विन

रवीचंद्रन अश्विन कसोटी क्रमावारीतील दुसऱ्या स्थानावरील गोलंदाज तसेच अष्टपैलुंमध्ये अग्रस्थानी. अश्विनची अष्टपैलु कामगिरी भारतीय संघात समतोल निर्माण करते. विराट कोहली आणि अनिल कुंबळेच्या जोडीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अश्विनला वृद्धिमान साहाच्या अगोदर फलंदाजीस पाठवून सर्वांनाच धक्का दिला. यासंधीचा अश्विनने पुरेपुर फायदा उठवला. तसे पाहता यापुर्वीसुद्धा अश्विनने आपल्या फलंदाजीची छाप सोडली आहे. परंतु विदेशी भुमिवरील कामगिरी नेहमीच अग्रस्थानी राहते.

अश्विनने आपल्या कारर्दीतील तीसरे शतक झळकावत ११३ धावांची खेळी करत २५३ चेंडूंचा सामना केला. केलेल्या चेंडूचा आकडा पाहता अश्विनच्या बचावाची कल्पना येते. शतकी खेळी करत अश्विनने कोहलीसोबत पाचव्या विकेटसाठी १६८ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. फलंदाजीला आल्यानंतर सुरुवातीस चाचपडणाऱ्या अश्विनने त्यानंतर प्रत्येक वेस्ट इंडिज गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. गोलंदाजांना अश्विनचा बचाव भेदणे अशक्य ठरत होते. ४३ धावांवर असताना अश्विनचा झेल यष्टीरक्षकाने सोडला, या संधीचा त्याने पुरेपुर फायदा उठवला. अश्विनची शतकी खेळी कट, लेट कट, स्ट्रेट ड्राईव्ह तसेच शॉर्ट पुल यासारख्या फटक्यांनी बहरली.

कोहली बाद झाल्यानंतर अश्विनने वृद्धिमान साहासोबत ७१ तसेच अमित मिश्रासोबत ५१ धावांची भागिदारी करुन भारताला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारुन दिली. यापुर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिका, न्युझिलंड व ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अश्विनला नेमक्याच संधी मिळाल्या पण त्यात त्याला गोलंदाजीत छाप पाडता आली नव्हती त्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये अश्विनला गोलंदाजीत महत्त्वपुर्ण कामगिरी करावी लागेल. अश्विनने फलंदाजीत सातत्या राखत ३३ कसोटीत ३ शतके आणि ६ अर्धशतकांसह १३१७ धावा ठोकल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वच्या सर्व शतके वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावली आहेत. याप्रकारची कामगिरी त्याने गोलंदाजीमध्ये कारावी हीच इच्छा.

शंतनु कुलकर्णी.

Thursday 7 July 2016

महेंद्रसिंग धोनी


महेंद्रसिंग धोनी नाव जगातील सर्वोत्कृष्ट कर्णधारामध्ये घेतले जाते त्याचबरोबर भारताकडून सौरव गांगुलीनंतर एक सर्वोत्कृष्ट कर्णधार. सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघामध्ये मुंबई, दिल्ली, बंगलोर, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरातुन आलेल्या खेळाडूंचे प्रमाण मोठे होते. परंतु काही कालावधी नंतर झहीर खान, महेंद्रसिंग धोनी, आर पी सिंग आणि सध्याच्या भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी आपल्या विभागाचे नाव जागतिक पातळीवर नावारुपास आणले.
भारतीय संघात दाखल होण्यापूर्वी धोनी खरगपूर रेल्वे विभागात तिकीट तपासणीस म्हणुन काम करत होता तेव्हा तो रेल्वे विभागाकडून क्रिकेट खेळू लागला. आपल्या क्रिकेटमध्ये केलेल्या प्रगतीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळविले. फुटबॉल खेळत असताना गोलरक्षकाची भुमिका घेण्यास सुरुवात केली. रांची सारख्या छोट्या शहरातुन आलेल्या धोनीला गांगुलीसारख्या सर्वोत्कृष्ट कर्णधाराकडून पर्दापणाची संधी मिळाली. आपल्या पहिल्या तीन सामन्यात धोनीला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले परंतु त्यानंतर पाकिस्तान विरूद्ध झालेल्या मालिकेत फरीदाबादमध्ये झालेल्या सामन्यात तीसऱ्याक्रमांकावर येताना १४८ ची खेळी करून एका नव्या आध्यायाला सुरुवात केली आणि आपले पहिले शतक झळकावले. श्रीलंकेविरुध्द धावांचा पाठलाग करताना नाबाद १८३ धावांची खेली केली. ज्यात ११ षटकारांचा समावेश होता आणि १० षटकारांच्या विक्रमांची बरोबरी केली त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसन ने बांगलादेश विरूध्द खेळताना १५ षटकार मारून विक्रम मोडला.
      भारताच्या पाकिस्तान दौऱ्याधोनीने आपल्या केसरचनेनी तसेच आपल्या खेळीने त्यावेळेसच्या पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदी असलेल्या परवेझ मुशरर्फ यांना भुरळ घातली होती. धोनीने एकदिवसीय सामन्यांनबरोबरच कसोटी सामन्यात सुध्दा पदार्पण केले आणि संघाचा एक अविभाज्य भाग बनला. एकहाती सामना फिरवण्याची ताकद यामुळे त्याने भारताला अनेक विजय मिळवून दिले. आपल्या कारकिर्दितील पहिला विश्वचषक खेळणाऱ्याधोनीला साजेशी कामगिरी करता आली नाही. विश्वचषकानंतर भारताचा इंग्लड दौरा होता यात पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव टाळला तर दुसऱ्या सामान्यात झालेल्या भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली आणि भारताला कसोटी मालिका जिंकण्यात यश आले त्यानंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला पराभव स्विकारावा लागला या मालिकेत धोनी पूर्णपणे अपयशी ठरला.
      २००७ साली झालेल्या पहिल्या टि-२० विश्वषचषकातुन सचिन, द्रविड व सौरवने माघार घेतल्याने कर्णधारपदाची पहिल्यांदा धोनीला जबाबदारी देण्यात आली. तसेच एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवामुळे द्रविडने कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. २००७ च्या  टि-२० विश्वचषकात धोनीन आपल्या नेतृत्वाने तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध व उपांत्य सामन्यात केलेली छोटेखानी खेळी सामन्याला कलाटणी देणारी ठरली आणि भारताला विश्वचषक जिंकून दिला.आपल्या पहिल्याच कर्णधारपदाच्या परीक्षेत चांगले यश मिळविल्यानंतर त्यालाच भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले यात कर्णधार नेमण्यात सचिन तेंडूलकरची भुमिका महत्त्वाची होती. धोनीच्या कारकिर्दीतील महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात २००८ साली जिंकलेली तिरंगी स्पर्धा, २०१० ची आशिया चषक स्पर्धा व न्युझिलंडमधील एकदिवसीय मालिका. २०१० साली भारतात झालेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेत कसोटी कर्णधार अनिल कुंबळेनी निवृत्ती घेतली आणि एकदिवसीय व टी-२० बरोबरच कसोटी कर्णधारपदी नेमणूक केली आणि आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवून दिला.
      महेंद्रसिंग धोनीच्या कारकिर्दितला एक महत्त्वाचा क्षण होता तो म्हणजे २०११ चा विश्वचषक. विश्वचषकापूर्वी संघाची कामगिरी तसेच १५ वर्षानंतर भारतीय उपखंडात झालेला विश्वचषक यामुळे भारताला प्रबळ दावेदार मानत होते. संपूर्ण विश्वचषकात धोनीला कामगिरी करण्यात अपयश आले होते पण विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धावांचा पाठलाग करताना सलामीवीर झटपट बाद झाले त्यानंतर गंभीर व कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती सावरते असे असतानाच कोहली बाद झाला आणि विश्वचषकात पहिल्यांदा धोनी युवराजच्या आधी फलंदाजीला आला आणि ९३ धावांची नाबाद खेळी करुन त्याने भारताला विश्वचषक जिंकून दिला तसेच धोनीला अंतिम सामन्याचा मानकरी म्हणून निवडण्यात आले.
      विश्वचषकानंतर झालेल्या इंग्लंड दौऱ्याभारताला ४-० ने कसोटी मालिकेत पराभव स्विकारावा लागला तसेच एकदिवसीय मालिकेत ३-० ने पराभव झाला. एका सामन्यात धोनीले केलेल्या फटकेबाजीच्या बळावर सामना बरोबरीत सोडवण्यात यश आले. इंग्लंड दौऱ्यात झालेला पराभवातुन संघ बाहेर येतो न तोच संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ४-० ने हार पत्करावी लागली तसेच तिरंगी एकदिवसीय मालिकेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात संघ अपयशी ठरला. भारताची विदेशी भुमिवरची कामगिरी खालावत गेल्याने धोनीला प्रसारमाध्यमांना तोंड द्यावे लागले तसेच कर्णधारपदाच्या राजीनाम्याची मागणीला जोर धरु लागली.
      २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेतही भारताला २-१ ने पराभव स्विकारावा लागला. मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी जुनैद खान आणि महम्मद इरफान समोर नांगी टाकली त्यानंतर धोनीने अश्विनच्या साथीने महत्त्वाची भागिदारी करत शतक झळकावले व भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. धोनीने भारतीय संघाबरोबरच आयपीएल मध्ये ८ वर्षे चेन्नई सुपर किंगचे नेतृत्व केले या ८ वर्षात धोनीने संघाला २ वेळेस विजेतेपद तसेच ४ वेळेस उपविजेतेपद मिळवून दिले त्याचबरोबर चॅम्पियन लीग मध्ये दोनदा विजेतेपद मिळवून दिले.
      २०१३ ची चॅम्पियन ट्रॉफी भारताला आशेचा किरण घेउन आली. इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीत एका युवा भारतीय संघाने सर्व मोठ्या संघांचा पराभव करुन अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. इंग्लंडमधील वातावरण हे वेगवान गोलंदाजासाठी अनुकुल असते पण चॅम्पियन ट्रॉफी पूर्वी झालेल्या ऍशेस मालिकेसाठी इंग्लंडनेफिरकी गोलंदाजासाठी अनुकुल खेळपट्या तयार केल्या होत्या हीच गोष्ट भारतीय फिरकीपटूंच्या पदरी पडली आणि रविंद्र जडेजाने सर्वाधिक विकेट घेऊन सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळविला. या स्पर्धेत भारताने अंतिम सामनाधरुन सर्वच सामने जिंकले.
      धोनी ज्याप्रकारे आयपीएल सामन्यात फलंदाजी करतो तशी फलंदाजी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये करण्यात तो अपयशी ठरला. २०१४ च्या टी-२० विश्वचषकात भारत अंतिम सामन्यात दाखल झाला आणि भारताला श्रीलंकेकडून पराभव स्विकारावा लागला. भारताला दक्षिण आफ्रिका व न्युझिलंडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये पराभवाला समोरे जावे लागले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला लॉर्डसचा कसोटीसामना जिंकण्यात यश आले परंतु कसोटी मालिकेत पराभव स्विकारावा लागला पण त्यानंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेत विजय संपादन केला भारतामध्ये २०१३ साली झालेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला ४-० ने लोळवले या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात चेन्नईत व्दिशतक झळकावूनभारताकडून कसोटीतव्दिशतकझळकावलेला पहिला यष्टिरक्षक ठरला.
      ज्याप्रमाणे धोनीने फलंदाजी व कर्णधारपदात संघाची कामगिरी ही वेगळ्याच एका स्थरावर नेऊन ठेवली. मग ते 'हेलिकॉप्टर शॉट' असो वा भारताच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांतील आजपर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार असो. त्याच्या नेतृत्वात संघाने २००७ चा टी-२० विश्वचषक, २०११ चा ५०-५० विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन ट्रॉफीला गवसणी घातली अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. तसेच तो तंत्रशुद्ध फलंदाज नाही हे त्याने स्वत:ही सांगितले आहे आणि ते त्याच्या फलंदाजीतुन सुद्धा दिसुन येते पण त्यातही त्याला इतके यश लाभले हे कौतुकास पात्र आहे.
      ज्याप्रकारे त्याने कर्णधापदी कामगिरी केली त्याचप्रमाणे त्याने यष्टिरक्षणसुद्धा एकदम वरच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे. मग ते झेल घेणे असो वा यष्टिचित करणे असो. काही वेळा तर तो यष्टिंवर आलेली थेट फेक न पकडता यष्टिंकडे न पाहता चेंडू फेकुन फलंदाजांना बाद केले तर सर्वांधिक यष्टिचित करण्याचा विक्रम त्याने त्याच्या नावे केला आहे. असंच २०१६ च्या टी-२० विश्वचषकात बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात बांग्लादेशला जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज होती त्यावेळेस परिस्थितीचे भान ठेऊन गोलंदाज हार्दिक पंड्याला चेंडू थोडी उजव्या यष्टी बाहेर टाकण्यास सांगितले तसेच चेंडूची चांगली पकड व जलदगतीने चेंडू फेकण्यासाठी धोनीने उजव्या हाताचा ग्लोज काढुन टाकला व त्यात तो यशस्वी सुद्धा झाला.
      २०१४-१५ चा ऑस्ट्रेलिया दौरा भारतासाठी मोठा तसेच आव्हानात्मक दौराहोता. कसोटीमालिकेत पहिल्या सामन्यात धोनी दुखापतग्रस्त असल्याने खेळु शकला नव्हता परंतु मालिकेतला दुसरा सामना धोनीसाठी कारकिर्दीतला शेवटाचा कसोटी सामना ठरला आणि एकदिवसीय व टी-२० स्पर्धांवर लक्ष देण्यासाठी कसोटीतुन निवृत्ती घेतली. परंतु एकदिवसीय मालिकेत वविश्वचषकात झिम्बांव्वे विरूध्दचा सामना सोडता धोनी पुर्णपणे अपयशी ठरला.विश्वचषकानंतरच्या बांगलादेशविरूध्दच्या मालिकेत भारताला २-१ ने पराभव स्विकारावा लागला. पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे अपयशी ठरल्यानंतर त्याला संघाबाहेर बसावे लागले याबाबत विचारले असता धोनीने सांगितले की उपखंडात रहानेला स्ट्राईक रोटेट करण्यात अडचन येते तसे पाहता जेव्हा धोनीला पुर्णवेळ कर्णधार म्हणून नेमले गेले त्यानंतर राहुल द्रविड व व्ही. व्ही. एस लक्ष्मण ने निवृत्ती जाहिर केली. लक्ष्मणने तर संघात समावेश झाल्यानंतर निवृत्ती जाहिर केली होती धोनीला पहिल्यापासुन युवा संघ हवा होता त्यामुळे सेहवाग, युवराज, द्रविड, झहीर खान, लक्ष्मण व गंभीर ला टीम पासुन बाहेर बसावे लागले.
      २०१५ च्या आफ्रिकाविरुद्धच्या टी-२० मालिकेत धोनी पुर्णपणे अपयशी ठरला तर एकदिवसीय मालिकेतील इंदोरच्या सामन्यात ९२ धावांची खेळी करत संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. तर काही सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत मालिकेत सातत्याने धावा काढणाऱ्या रहाणेची जागा प्रत्येक सामन्यागणिक बदलु लागला. त्यामुळे त्याच्यावर टिकाही झाली. त्यानंतर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय मालिकेतील ४ सामन्यात धोनी अपयशी ठरला पण शेवटच्या सामन्यात ३४ धावांची खेळी करत शतकवीर मनिष पांडे सोबत ९४ धावांची भागिदारी करत मालिकेत एकमेव विजय मिळवुन दिला आणि हाच विजय भारताला टी-२० मालिकेत ३-० ने विजय मिळवुन देण्यात महत्त्वाचा ठरला.
      धोनीची अपयशाची मालिका श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत व २०१६ च्या टी-२० विश्वचषकातही सुरुच राहिली. पण अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० मध्ये ४३ धावांची खेळी करत के एल राहुलला साथ देत १०७ धावांची भागिदारी रचली पण तो संघाला विजय मिळवुन देण्यात अपयशी ठरला व भारताला १ धावेने सामना गमवावा लागला. तर त्याची न्युझिलंडविरुद्धची कामगिरी त्यातला त्यात ठीक झाली. पहिल्या दोन सामन्यात मालिका १-१ ने बरोबरीत झाल्यानंतर तीसऱ्या सामन्यात विजय मिळवुन आघाडी मिळवण्याती दोन्ही संघ आतुर होते. न्युझिलंडने भारतासमोर २८५ धावांचे आव्हान ठेवले होते. २ बाद ४१ अशी अवस्था झाल्यानंतर कोहली व धोनीच्या जोडीने १५० धावांची भागिदारी करत भारताला विजय मिळवुन देण्यात महत्त्वाची भुमिका बजावली यात धोनीने ८० धावांची उपयुक्त खेळी केली तसेच भारताने मालिकेत ३-२ ने विजय संपादन केला.तब्बल ८ वर्षे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंगचे नेतृत्व केल्यानंतर २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व केले. चेन्नई सोबतच्या ८ सत्रात त्याने संघाला ६ वेळेस अंतिम सामन्यात प्रवेश मिळवुन दिला आणि त्यातील २ वेळेस विजेतेपद मिळवुन दिले व २ वेळेस च्रॅम्पियन लीगचे विजेतेपद मिळवुन दिले खरे पण त्याप्रकारचा त्याचा करीष्मा २०१६ मध्ये चालला नाही आणि संघाला ७ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
      धोनीने रहाणे बाबत दिलेले उत्तर पटत नाही. धोनी म्हणतो की रहाणे पहिल्या तीन स्थानांवरच खेळु शकतो पण ज्याप्रकारे रहाणेची कसोटील कामगिरी पाहता रहाणे कोणत्याही स्थानावर खेळु शकतो तसे पाहता ज्याप्रकारे द्रविड ने आपल्या कारकिर्दीत ४-५ क्रमांकावर खेळुन १०,००० पेक्षा जास्त धावा केल्या त्यामुळे रहाणेची शैली पाहता ४ क्रमांकावर खेळू शकतो. पण त्यावेळेस धोनीला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यायला पाहिजे होते त्यावेळेस खालच्या क्रमांकावर येण्यास पसंती देत. धोनी कर्णधार झाल्यापासुन आयपीएल मधील धोनीच्या चेन्नई सुपर किंग संघातील खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर भारतीय संघात समावेश झाला त्यात आश्विन, जडेजा, मोहित शर्मा, बालाजी, मुरली विजय यातील आश्विनने मुरली विजयने चांगल्याप्रकारे कामगिरी केली परंतु मोहित शर्मा जो फक्त आपीएलच्या कामगिरी वर संघात कायम आहे. रैना व जडेजाने काही प्रमानात कामगिरी केली पण रैनाला फलंदाजीत बढती साठी धोनी रहाणेचा बळी देतो आहे काॽ जडेजा सुध्दा एक गोलंदाज म्हणुन कामगिरी करतो पण त्याला एक अष्टपैलु म्हणुन संघात ठेवले होते. रहाणे सारखे खेळाडू हे संघातील राजकारणाचे बळी ठरत आहेत काॽ


Sunday 3 July 2016

सुरेश रैना

सुरेश रैना क्रिकेट जगतात आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने झळकलेले एक नाव. उत्तर प्रदेशातील मुरादानगरमध्ये जन्मलेल्या रैनाने आपल्या चपळ क्षेत्ररक्षण व फलंदाजीने सर्वांना मोहून टाकले. रैनाने रणजीत उत्तर प्रदेशचे तसेच भारताच्या युवा संघाचे नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपरकिंगसाठी रैनाने केलेली कामगिरी अनोखी आहे. रैनाने युवराज सिंग, महम्मद कैफ तसेच सध्याच्या जडेजा, रहाने व कोहलीच्या साथीने आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने अनेक धावा रोखल्या तसेच अप्रतिम झेल घेतले.
भारताच्या युवा (१९ वर्षांखालील) संघासमवेत केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात समावेश करण्यात आला. आपल्या पदार्पणाच्या सत्रात रैनाला हवी तशी कामगिरी करण्यात अपयश आले. रैनाच्या अपयशी कामगिरीमुळे त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. २००६ सालच्या अपयशी कामगिरीनंतर संघाबाहेर गेल्यानंतर रैनाला दुखापतीने ग्रासले. दुखापतीतुन बाहेर आल्यानंतर त्याने आपली कामगिरी सुधारण्यावर भर दिला. २००८ साली सुरु झालेली आयपीएल रैनासाठी आशेचा किरण ठरला. रैनाची चेन्नई सुपरकिंग संघात निवड करण्यात आली आणि त्याला भारतीय संघाच्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली.रैनाची आयपीएलमधल्या कामगिरीच्या जोरावर स्पर्धेच्या यशस्वी फलंदाजामध्ये ओळख आहे. त्याला आयपीएलच्या सलग सात सत्रात ४०० पेक्षा जास्त धावा करण्यात यश आले हीच कामगिरी रैनाला भारतीय संघात परत येण्यात महत्त्वाची ठरली. रैनाने आपल्या कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंगला आयपीएल चषक व चॅंपियन लिग तसेच जिंकण्यात तसेच क्रिकेटविश्वात एक यशस्वी टी-२० संघ म्हणून नावारूपास आणले. भारतीय संघात पुन्हा मिळालेली संधी रैना दोन्ही हातांनी मिळालेल्या संधीचा फायदा उठवण्याच्या तयारीत होता.
संघात सचिन तेंडूलकर, गौतम गंभीर, सेहवाग, युवराज असताना रैनाकडे मधल्या व खालच्या क्रमांकावरील फलंदाजातील दूवा म्हणून पाहिले जात या संधीचा रैनाने पूर्णपणे फायदा घेतला. तसेच धोनीच्या साथीने व युवराजच्या साथीने रैनाने भारताला सामने जिंकून दिले. या कामगिरीच्या जोरावर रैनाची भारताच्या २०११ च्या विश्वचषक संघात निवड करण्यात आली.विश्वचषकच्या सुरुवातीच्या काही सामन्यात रैनाला संघाबाहेर बसावे लागले परंतु युसुफ पठाणची अयशस्वी कामगिरी रैनाला अंतिम ११ मध्ये संधी मिळण्यास उपयोगी ठरली. या विश्वचषकत रैनाने उपउपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध केलेलीनाबाद ३४ धावांची खेळी तसेच उपांत्य सामन्यात पाकिस्तानविरूद्ध महत्त्वाच्या क्षणी केलेली नाबाद ३६ धावांची खेळी भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची ठरली आणि भारताला विश्वचषक जिंकवण्यात मोलाची कामगिरी केली.
रैनाकडे एकदिवसीय व टी-२० खेळाडू म्हणून पाहिले जाते पण रैनाने आपल्या कामगिरीच्या जोरावर कसोटी संघात स्थान मिळविले व आपल्या पदार्पणाच्या कसोटीत श्रीलंकेविरूद्ध शतक झळकावले पण रैनाला एकदिवसीय व टी-२० इतके यश कसोटीत मिळविण्यात अपयश आले आणि त्याला संघाबाहेर रहावे लागले. टी-२० मध्ये भारताकडून पहिले शतक झळकावण्याचा विक्रम रैनाच्याच नावावर आहे हे शतक रैनाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध २०१० मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकत झळकावले. रैनाची ओळखही मर्यादीत षटकांच्या सामन्यातील एक उत्कृष्ट फलंदाज तसेच एक पर्यायी ऑफ स्पिन गोलंदाजीसुद्धा कर्णधाराला एक उपाय देतो. सध्या रैना भारतीय संघासाठी स्लिप मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झेल पकडणे, धावा रोखणे आणि थेट फेकीने फलंदाज बाद करण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडतो.
      रैनाने २०१४ साली इंग्लंडविरूद्ध ७५ चेंडूत झळकावलेले शतक हे रैनाने त्याच्या कमकुवत गोष्टींवर काम करुन आपल्या आत्मसात करुन कमकुवत गोष्टींना जमेची बाजू बनवली. २०१५ च्या विश्वचषकत रैना भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू होता. रैनाने झिम्बावेविरूद्ध झळकावलेले शतक जेव्हा भारताचे चार गडी बाद झाल्यानंतर भारत अडचणीत सापडला होता आणि भारताला अजुन मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, रैनाने धोनीच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला.विश्वचषकात २८४ धावां काढत प्रभावी कामगिरी केल्यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेत छोट्या खेळी करत ११२ धावा फटकावल्या पण तो भारताला मालिका पराभवापासुन वाचवु शकला नाही. २०१५ आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय मालिकेत रैना पुर्णपणे अपयशी ठरला. ५ सामन्यांपैकी ३ सामन्यांत तर त्याना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. चौथ्या सामन्यांत त्याने ५३ धावांची खेळी केली पण त्यानंतरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत ४१ व नाबाद ४९ धावांची खेळी करत भारताला ३-० ने विजय मिळवण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडली पण त्यानंतरच्या श्रीलंका, आशिया चषक व टी-२० विश्वचषकात धावा काढण्यात तो अपयशी ठरला पण गोलंदाजीत आपले योगदान देत होता.
      आयपीएलची सुरुवात झाल्यापासुन रैना धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपरकिंगचे सलग ८ वर्षे प्रतिनिधित्व करत होता. पण २०१६ मध्ये आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या गुजरात लायन्सच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली त्यात त्याने संघाला अंतिम चार संघात स्थान मिळवुन दिले पण त्याच्या संघाला उपांत्य फेरीत पराभव स्विकारावा लागला. न्युझिलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली होती पण सरावा दरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने त्याला एकही सामना खेळता आला नाही आणि त्याच्या जागी मिळालेल्या संधीचा केदार जाधवने पुरेपुर फायदा उठवत अष्टपैलु कामगिरी केली. त्यामुळे एखाद्या दुखापतीमुळे रैनाला एकदिवसीय सामन्यांतल स्थान गमवाव लागु नये हिच एक इच्छा. तसेच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या संघातही त्याचा समावेश न झाल्याने त्याची चॅम्पियन ट्रॉफीच्या संघात समावेश होण्याची शक्यता कमीच आहे.सद्यस्थितीत भारताकडे मधल्या फळीत खेळणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे रैनाला कामगिरीत सातत्य ठेऊन फलंदाजीने भारताला सामने जिंकुन द्यावे लागतील. 
शंतनु कुलकर्णी